चिंतन : शून्य व समत्व

 चिंतन :

🌍शून्य व समत्व🌏

..................................

विश्वव्यापक, अनंत, अमर्याद, अगणित, रितेपणाची, शून्याची आपल्याला जाणीवच नसते. 

या वस्तुस्थितीचे दर्शन कधी घडत नसते. 


म्हणून अहंकार हाच आपल्या सत्यदर्शनातला खरा अडथळा आहे, हे संतवचन नेहमी तुम्ही ऐकलेच असेल. 

ही जी मूळ वस्तुस्थिती आहे, मूळ अवस्था आहे तेच सत्य आहे.


सर्वांच्याबाबतीत ही अवस्था एकच आहे मग तो पशू असो, प्राणी असो, मानव असो किंवा कोणताही पदार्थ.


 सर्व अस्तित्वाची उत्पत्ती याच सत्यापासून झाली आहे.


 ही अनुभूती प्रत्यक्ष येईपर्यंत आपल्याला ज्ञान झालेलेच नसते. 


तोपर्यंत आपण अज्ञानातच जगत असतो. 


ही अनुभूती पुस्तक वाचून किंवा निव्वळ वरवर प्रवचन ऐकून येत नसते .


तर जेव्हा आपल्या अंतरंगात प्रचंड तहान निर्माण होते,


 सर्व जगाचे अस्तित्व, 


आपले स्वत:चे अस्तित्व,


 आपले मन, 


आपली पंचज्ञानेंद्रिये, 


पद, 

पैसा. 

प्रसिध्दी, 


भोगविलास, 


आपले प्रयत्न, 


आपले कर्म, 


सर्व तथाकथित अध्यात्म, 


सर्व ध्यानपध्दती,


 सर्व कर्मकांड,


 सर्व पुस्तकी ज्ञान, 


आपला सतत काहीतरी मिळविण्याचा,


 काहीतरी होण्याचा प्रयत्न 


हे सर्व अर्थहीन असल्याचे आपल्या लक्षात येते,

 मग मनाच्या भ्रामक कल्पनेत कसे बध्द आहोत, 

आपण केवळ भूतकाळातील संस्कारात कसे जखडले गेलो आहोत असे प्रत्यक्ष आतून कळायला लागते. 


तेव्हा मनाशी तादात्म्य तुटून आपण निर्विकार निरीक्षणाला प्राप्त होतो व अहंकाराचे, आपल्या सर्व पूर्वसंस्कारांचे विसर्जन समजेतून होऊन आपण मूळ अवस्थेला प्राप्त होतो.


 जी शून्यावस्था आहे.


अहंकाराला अंतर्मनात खूप खोलवर असलेल्या रितेपणाची, शून्याची जाणीवच नसते व तशी करुन घेण्याची इच्छाही नसते. 


कारण संपूर्ण रितेपणाची जाणीव अहंकाराचे समूळ उच्चाटन घडवून आणते. 


अनुभवाचे बळकटीकरण करुन या रितेपणाच्या वस्तुस्थितीपासून उलट दिशेला जाण्याचा मनाचा सतत प्रयत्न असतो. 


म्हणून विचारांच्या, 

मनाच्या, 

इच्छेच्या, 

वासनांच्या पलीकडे जाण्याची गरज संत लोक हजारो वर्षांपासून प्रतिपादन करित आले आहेत.


 पण त्याचा साधा अर्थही आपल्या बथ्थड मनाला कधी कळत नसतो.

 या काही नसणेपणापासून, रितेपणापासून आपण कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी ते अस्तित्वात तर असतेच. 


मात्र या वस्तुस्थितीपासून दूर जाण्यासाठी अहंकार नाना पळवाटा शोधत असतो.


 म्हणून जर आपण पळवाट शोधणे बंद केले व आवड निवड विरहित असे अवधान आपण ठेवू शकलो तर या रितेपणाशी व काही नसण्याची व आपली प्रत्यक्ष गाठ पडू शकते. 


हा निसर्गाचा नियम आहे. 


या गाठ पडण्यालाच साक्षात्कार असे म्हणतात. 


कारण तेव्हाच आपल्याला वस्तुस्थितीचे व स्वरुपाचे दर्शन होते.


 ‘पार्था समत्व बुध्दिचे, ते सार जाण योगाचे’, 


असे ज्ञानेश्वरीत स्पष्ट सांगितले आहे.


 असे हे जे आवड निवड विरहित अवधान आहे, 


या अवलोकनालाच ध्यान असे म्हणतात.


 प्रज्ञा प्राप्तीचा तोच एकमेव मार्ग आहे. 


यालाच स्थितप्रज्ञता, 

विपश्यना, 

मेडिटेशन,

 सामायिक,

 समता,

 स्थायीभाव, 

निर्विकल्प निरीक्षण

 अशी खूपशी नावे आहेत.


असो .

........................

- विजय पांढरे

( youtube channel: Vijay pandhare)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या